अंधश्रद्धा निर्मूलन..काळजी गरज
आजच्या काळात विज्ञान खूप प्रगत झाले असले तरी समाजामध्ये अजूनही बऱ्याच ठिकाणी अंधश्रद्धा आढळते. वास्तविक ज्ञानाअभावी चुकीच्या समजुतींवर आंधळा विश्वास ठेवणे, याला अंधश्रद्धा म्हणतात. अंधश्रद्धेमुळे लोक ताईत बांधणे, जादूटोणा करणे, अपशकुन मानणे, ग्रह-तारे दोष देणे अशा अवैज्ञानिक गोष्टींवर विश्वास ठेवतात.
अंधश्रद्धा वाढण्याची मुख्य कारणे म्हणजे अज्ञान, भीती, शिक्षणाचा अभाव, परंपरेचा अति आग्रह, तसेच काही लोकांची फसवणूक करण्याची प्रवृत्ती. अनेक वेळा लोक एखादी घटना घडल्यावर वैज्ञानिक कारण शोधण्याऐवजी भूत-प्रेत किंवा देवदोष मानतात.
अंधश्रद्धेमुळे समाजाचे मोठे नुकसान होते. चुकीच्या उपचारांवर विश्वास ठेवल्यामुळे लोक वेळेवर डॉक्टरांकडे जात नाहीत. काही वेळा गावांमध्ये “चेटकीण” भूत अंगात येणे किंवा शिरणे असा खोटा आरोप करून व्यक्तींना त्रास दिला जातो. पैशांची फसवणूक होते आणि लोकांमध्ये भीती पसरते. अशा विचारांनी समाज प्रगती करू शकत नाही.
अंधश्रद्धा दूर करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी सर्वप्रथम लोकांना योग्य शिक्षण मिळणे आवश्यक आहे. शाळा आणि घरी मुलांना विज्ञानाधारित विचार समजावून सांगणे गरजेचे आहे. कोणतीही गोष्ट अंधविश्वासाने न मानता तिचे तर्कशुद्ध कारण शोधण्याची सवय प्रत्येकाने लावली पाहिजे. महाराष्ट्रात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’च्या माध्यमातून समाजात वैज्ञानिक दृष्टीकोन जागवण्यासाठी मोठे कार्य केले आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन म्हणजे फक्त अंधविश्वास नष्ट करणे नाही, तर विज्ञान, तर्क, आणि विवेकावर आधारित विचार रुजवणे होय. प्रत्येक नागरिकाने या कामात हातभार लावल्यास समाज अधिक प्रगत, सुरक्षित आणि सुजाण बनेल.
अंधश्रद्धा ही समाजाच्या प्रगतीची अडचण आहे. योग्य शिक्षण, जागृती आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांच्या मदतीनेच आपण अंधश्रद्धा दूर करून उज्वल भविष्य घडवू शकतो.
आरोही गोरेगावकर शाळा सुभाष नगर
इयत्ता सातवी
No comments:
Post a Comment