जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुभाषनगर माझे विचार माझे लेखन या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
विद्यार्थी चे लेखन निर्मिती ब्लॉग * FOLLOW MY BLOG

Wednesday, November 26, 2025

वस्तूंचा पुनर्वापर

वस्तूंचा पुनर्वापर – आजची गरज

आजच्या आधुनिक आणि वेगवान जीवनशैलीत कचऱ्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. प्लॅस्टिक, काच, धातू, कागद, कपडे अशा अनेक वस्तू एकदा वापरून फेकून देण्याची सवय वाढली आहे. या सवयीमुळे पर्यावरणावर मोठा ताण निर्माण होत आहे. अशा वेळी वस्तूंचा पुनर्वापर  हा पर्यावरण संरक्षणाचा सर्वात सोपा, परिणामकारक आणि किफायतशीर उपाय ठरतो.

पुनर्वापर म्हणजे आधीच वापरलेली वस्तू पुन्हा वेगळ्या पद्धतीने किंवा त्याच कामासाठी वापरणे. उदाहरणार्थ, काचेच्या बाटल्या स्टोरेजसाठी वापरणे, जुन्या कपड्यांपासून पिशव्या तयार करणे, तुटलेल्या टायरपासून झुला किंवा फुलदाणी तयार करणे, डबे-कॅन्सपासून शोपीसे बनवणे इत्यादी. अशा साध्या-सोप्या कृतींमुळे कचरा कमी होऊन पर्यावरणावरचा ताण हलका होतो.

पुनर्वापराचे अनेक फायदे आहेत. यामुळे कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा खर्च कमी होतो. नवीन वस्तू खरेदी करण्याची गरज कमी झाल्याने पैशांची बचत होते. संसाधनांची बचत होते, कारण नवीन उत्पादनांसाठी लागणारा कच्चा माल, पाणी, वीज आणि ऊर्जा कमी खर्ची पडते. पुनर्वापरामुळे प्रदूषण कमी होते आणि पृथ्वी स्वच्छ, हिरवी राहण्यास मदत होते. तसेच विद्यार्थ्यांमध्ये आणि समाजात सर्जनशीलता वाढते.

आजच्या घडीला शाळा, पर्यावरण संस्था, ग्रामपंचायती आणि महापालिका यांच्याद्वारे पुनर्वापराविषयी जनजागृती केली जात आहे. ‘Reduce-Reuse-Recycle’ हा मंत्र प्रत्येकाने आचरणात आणणे गरजेचे आहे. घरातील कचरा वेगळा करणे, प्लॅस्टिकचा वापर कमी करणे, पुनर्वापरयोग्य वस्तू तयार करणे यांसारख्या छोट्या-छोट्या कृतींचा मोठा परिणाम घडतो.

मी माझ्या जीवनात सुद्धा एखादी वस्तू खराब झाली तर ती दुरुस्त करण्यावर भर देतो, दुरुस्त करून ती वापरतो त्याचप्रमाणे कापडी पिशव्यांचाच मी वापर करतो अशा अनेक गोष्टी आपण केल्या तर  पर्यावरणाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. पुनर्वापर हा फक्त पर्यावरणीय नाही तर सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्याही महत्त्वाचा विषय आहे. प्रत्येकाने पुनर्वापराची सवय लावली तर स्वच्छ, सुंदर आणि टिकाऊ भविष्यासाठी मोठे पाऊल उचलले जाईल. पुनर्वापर हीच पर्यावरण वाचविण्याची गुरुकिल्ली आहे. 


शंकर शिवनगी 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुभाष नगर तालुका कोरेगाव जिल्हा सातारा


Monday, November 24, 2025

खेळाचे महत्व..

खेळाचे महत्व..

मानवाच्या सर्वांगीण विकासामध्ये खेळांचे योगदान मोठे आहे. अभ्यासाइतकेच खेळदेखील मुलांच्या व्यक्तिमत्त्व घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. शारीरिक, मानसिक आणि सामाजिक विकासासाठी खेळ अत्यावश्यक आहेत. म्हणूनच “खेळल्याने होईल तंदुरुस्त, अभ्यासाने होईल हुशार” असे म्हटले जाते.

खेळामुळे शरीरातील सर्व अवयव सक्रिय राहतात. धावणे, उडी मारणे, बॉल फेकणे, पोहणे या क्रियांमुळे स्नायू मजबूत होतात आणि शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. नियमितपणे खेळ खेळल्यास लठ्ठपणा, मधुमेह, हृदयविकार यांसारख्या आजारांपासून बचाव होतो. शारीरिक तंदुरुस्ती बरोबरच सहनशक्ती आणि चपळता वाढते.

खेळांमुळे मुलांमध्ये शिस्त, संघभावना, आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि निर्णयक्षमता विकसित होतात. सामूहिक खेळांमधून सहकार्य, परस्पर आदर आणि टीमवर्क शिकायला मिळते. जिंकणे किंवा हरिणे कसे स्वीकारायचे, हा महत्त्वाचा जीवन धडा देखील खेळातूनच मिळतो.

खेळ मानसिक आरोग्यासाठीही अतिशय उपयुक्त आहेत. धावण्यामुळे आणि शरीर हालचालींमुळे ताण कमी होतो. मन प्रसन्न राहते. अभ्यासाचा ताण दूर होऊन शिकण्याची क्षमता वाढते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नियमितपणे किमान एक तास तरी खेळावे.

देशाच्या प्रगतीतही खेळांचे महत्त्व खूप आहे. आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये खेळाडू देशाचे प्रतिनिधित्व करतात आणि देशाचा प्रतिष्ठेने झेंडा फडकवतात. आज क्रिकेट, हॉकी, कबड्डी, बैडमिंटन, कुस्ती, धावणे भालाफेक  अशा अनेक खेळांत भारतीय खेळाडूंनी जागतिक पातळीवर भरघोस यश मिळवले आहे.


खेळ हे जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. ते शरीर निरोगी, मन प्रसन्न आणि व्यक्तिमत्त्व सक्षम बनवतात. शाळांनी, पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी खेळांना अभ्यासाइतकाच महत्व दिले पाहिजे. शाळेमध्ये आयोजित केलेल्या खेळांच्या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी आवडीने भाग घेतला पाहिजे .कारण निरोगी शरीरातच निरोगी मन वास करते, आणि यासाठी खेळ हा सर्वोत्तम मार्ग आहे. म्हणून सर्वांनी आयुष्यभर  एक खेळ खेळायला पाहिजे..

धन्यवाद

रेणुका नायकवडी..

शाळा सुभाष नगर 

इयत्ता सहावी

अंधश्रद्धा निर्मूलन..काळजी गरज

अंधश्रद्धा निर्मूलन..काळजी गरज


आजच्या काळात विज्ञान खूप प्रगत झाले असले तरी समाजामध्ये अजूनही बऱ्याच ठिकाणी अंधश्रद्धा आढळते. वास्तविक ज्ञानाअभावी चुकीच्या समजुतींवर आंधळा विश्वास ठेवणे, याला अंधश्रद्धा म्हणतात. अंधश्रद्धेमुळे लोक ताईत बांधणे, जादूटोणा करणे, अपशकुन मानणे, ग्रह-तारे दोष देणे अशा अवैज्ञानिक गोष्टींवर विश्वास ठेवतात.

अंधश्रद्धा वाढण्याची मुख्य कारणे म्हणजे अज्ञान, भीती, शिक्षणाचा अभाव, परंपरेचा अति आग्रह, तसेच काही लोकांची फसवणूक करण्याची प्रवृत्ती. अनेक वेळा लोक एखादी घटना घडल्यावर वैज्ञानिक कारण शोधण्याऐवजी भूत-प्रेत किंवा देवदोष मानतात.

अंधश्रद्धेमुळे समाजाचे मोठे नुकसान होते. चुकीच्या उपचारांवर विश्वास ठेवल्यामुळे लोक वेळेवर डॉक्टरांकडे जात नाहीत. काही वेळा गावांमध्ये “चेटकीण”  भूत अंगात येणे किंवा शिरणे असा खोटा आरोप करून व्यक्तींना त्रास दिला जातो. पैशांची फसवणूक होते आणि लोकांमध्ये भीती पसरते. अशा विचारांनी समाज प्रगती करू शकत नाही.

अंधश्रद्धा दूर करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी सर्वप्रथम लोकांना योग्य शिक्षण मिळणे आवश्यक आहे. शाळा आणि घरी मुलांना विज्ञानाधारित विचार समजावून सांगणे गरजेचे आहे. कोणतीही गोष्ट अंधविश्वासाने न मानता तिचे तर्कशुद्ध कारण शोधण्याची सवय प्रत्येकाने लावली पाहिजे. महाराष्ट्रात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’च्या माध्यमातून समाजात वैज्ञानिक दृष्टीकोन जागवण्यासाठी मोठे कार्य केले आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन म्हणजे फक्त अंधविश्वास नष्ट करणे नाही, तर विज्ञान, तर्क, आणि विवेकावर आधारित विचार रुजवणे होय. प्रत्येक नागरिकाने या कामात हातभार लावल्यास समाज अधिक प्रगत, सुरक्षित आणि सुजाण बनेल.

अंधश्रद्धा ही समाजाच्या प्रगतीची अडचण आहे. योग्य शिक्षण, जागृती आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांच्या मदतीनेच आपण अंधश्रद्धा दूर करून उज्वल भविष्य घडवू शकतो.

आरोही गोरेगावकर शाळा सुभाष नगर
इयत्ता सातवी 

प्रदूषण एक गंभीर समस्या..


आजच्या वेगवान औद्योगिक युगात प्रदूषण ही संपूर्ण जगासमोर उभ्या राहिलेली सर्वांत गंभीर समस्या आहे. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे मानवी जीवनमान उंचावले असले, तरी या प्रगतीचा पर्यावरणावर अत्यंत घातक परिणाम झाला आहे. मानवाने आपल्या गरजा भागवण्यासाठी नैसर्गिक साधनसंपत्तीचा अनियंत्रित वापर केला, जंगलतोड केली, औद्योगिक उत्पादन वाढविले आणि याच प्रक्रियेत प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत गेली.

प्रदूषण म्हणजे हवा, पाणी, माती अथवा आवाज यामध्ये हानिकारक, विषारी, अवांछित घटकांचे प्रमाण वाढणे होय. याचे प्रमुख प्रकार हवाप्रदूषण, पाणीप्रदूषण, मृदाप्रदूषण, ध्वनीप्रदूषण व प्रकाशप्रदूषण असे आहेत.

हवाप्रदूषण प्रामुख्याने वाहनांचा धूर, कारखान्यांमधून बाहेर पडणारे रासायनिक वायू, कोळसा व डिझेल जाळण्यामुळे वाढते. प्लास्टिक जाळणे आणि जंगलातील वनवाई यामुळेही हवा अत्यंत दूषित होते.

पाण्याचे प्रदूषण नाल्यांचे पाणी, कारखान्यांचा औद्योगिक कचरा, पाण्यात मिसळणारी रासायनिक खते व कीटकनाशके यामुळे वाढते. नद्यांचे पाणी दूषित होऊन ते पिण्यालाही अयोग्य ठरते.

मृदाप्रदूषण प्लास्टिकचा वाढता वापर, रासायनिक शेती, धातूंचे अवशेष आणि औद्योगिक कचरा यांमुळे होते. यामुळे जमिनीची सुपीकता कमी होते.

ध्वनीप्रदूषण वाहने, साऊंडसिस्टम, फटाके यांचे आवाज वाढल्यामुळे निर्माण होते. अलीकडच्या काळात शहरांमध्ये याचे प्रमाण अत्यंत वाढत आहे.

प्रदूषणाचे परिणाम अत्यंत घातक आहेत. हवाप्रदूषणामुळे दमा, ब्राँकायटिस, हृदयविकार, कर्करोग यांसारखे आजार वाढत आहेत. पाण्याचे प्रदूषण झालेल्या भागांमध्ये पाचनसंस्थेचे आजार, त्वचारोग आणि जलजन्य आजार वाढतात. मृदाप्रदूषणामुळे शेती उत्पादन घटते, जमीन नापीक होते. ध्वनीप्रदूषणामुळे मानसिक ताण, चिडचिड, बेचैनी आणि श्रवणशक्ती कमी होणे यासारखे त्रास दिसून येतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रदूषणामुळे हवामान बदल, तापमानवाढ, हिमनद्या वितळणे, अनियमित पावसाळा, चक्रीवादळे आणि दुष्काळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तींची संख्या वाढत चालली आहे.

प्रदूषण रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे आवश्यक आहे. झाडे लावणे, प्लास्टिकचा वापर कमी करणे, कचऱ्याचे वर्गीकरण करणे, सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणे, अक्षय ऊर्जास्रोतांचा अवलंब करणे, पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करणे हे उपाय अतिशय महत्त्वाचे आहेत. शाळा, महाविद्यालये आणि समाजामध्ये पर्यावरण जनजागृती वाढवणे ही काळाची गरज आहे.

शेवटी, प्रदूषण ही समस्या मानवनिर्मित असल्यामुळे तिचे समाधानही मानवानेच शोधणे आवश्यक आहे. प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखली, नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन केले आणि प्रदूषणमुक्त पृथ्वी घडविण्याचा संकल्प केला, तर निसर्ग पुन्हा हिरवा व स्वच्छ बनेल आणि पुढील पिढ्यांसाठी आरोग्यपूर्ण भविष्य निर्माण होईल. पृथ्वीला वाचवण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे.

Wednesday, November 19, 2025

जल है तो कल है...!!!

पाणी हेच जीवन,

पाणी ही सर्व सजीवांना निसर्गाकडून मिळालेली अनमोल देणगी आहे. पाण्याला जीवन असेही म्हणतात. पाण्याशिवाय कोणताही सजीव जगू शकत नाही. सर्व सजीवांना जगण्यासाठी पाणी अत्यंत आवश्यक आहे.

पाणी ही आपली मुलभूत गरजा आहे. मनुष्याला फक्त पिण्यासाठी नाही तर आंघोळीसाठी, कपडे धुण्यासाठी, भाडी धुण्यासाठी स्वच्छतेसाठी म्हणजेच दैनंदिन कामासाठी पाण्याचा उपयोग होतो. औद्‌योगिक क्षेत्रात तसेच ऊर्जा निर्मितीसाठी ही पाण्याचा उपयोग होतो. शेतीसाठी तर पाणी खूप गरजेचे आहे.

मानवी शरीर अन्नाशिवाय काही दिवस जिवंत राहू शकते पण पाण्याशिवाय जास्त दिवस जगूच शकत नाही. पाणी ही जीवनाचा अविभाज्य घटक आहे.

पृथ्वीचा 73 टक्क्के भाग पाण्याने आपला आहे. तरीही पिण्यायोग्य पाणी खूप कमी आहे. वाढती लोकसंख्या गैरवापर इ. औद्योगिकरण, जंगल तोड, जल प्रदूषण, पाण्याचा गैरवापर इ. कारणांमुळे पाणी टंचाई जाणवते आहे.

प्रत्येक व्यक्तीने जर पाण्याचे महत्व समजून पाण्याचा उपयोग योग्य प्रकारे केला तर पाण्याची कमी भासणार नाही. म्हणतात ना-"थेंबे-"थेंबे थेंबे तळे साचे"

 पृथ्वीवरील सजीव प्राण्यांना व वनस्पतींना पाण्याची नितांत आहे. कारण पाणी हेच जीवन आहे. पाण्याचे संवर्धन, करणे ही काळची गरज आहे आहे, आपन पाणी वाचवले तर नक्कीच आपले भविष्य सुरक्षित राहील. कारण पाणी नाही तर जीवन नाही..

जल है तो कल है....
धन्यवाद 

रागिनी सुरेंद्र गौतम इयत्ता सहावी 
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुभाषनगर तालुका कोरेगाव जिल्हा सातारा

Tuesday, November 18, 2025

बालदिन.. बालकांचा..

बालदिन

भारतात १४ नोव्हेंबर हा दिवस बालदिन म्हणून उत्साहात साजरा केला जातो. हा दिवस भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन आहे पंडित जवाहलाल नेहरु यांना लहान मुले फार आवडत असत. मुले त्यांना प्रेमाने चाचा नेहरू म्हणत पंडित नेहरू म्हणत की, आजची मुले उद्याचा भारत घडवतील म्हणून मुलांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर दिला

पंडित जवाहलाल नेहरूंनी मुलांना प्राथमिक शिक्षण मिळावे म्हणून खूप प्रयत प्रयत्न केले. मुलांवर चांगले संस्कार करावेत असे विचार माडले, बालदिन हा महत्वाचा दिवस आहे या दिवशी प्रत्येक शाळेत प्रश्नमंजूषा, भाषण, वादविवाद, कीडास्पर्धा, नृत्य, गायन इ कार्यक्रम आयोजित केले जातात.

बालदिन देशात बाल हक्क, बालशिक्षिण, बालसंगोपन इ. विषयी जागरुकता वाढवतो मुलांचे बालपण जोपासणे, त्यांना सुविधा पुरवणे ही आपली जबाबदारी आहे अनेक ठिकाणी मुलांना भेटवस्तू दिल्या जातात..

बालदिनादिवशी देशभर मुलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, दूरदर्शन, आकाशवाणीवर मुलांचे कार्यक्रम सादर केले जातात. काही लोक अनाथ, गरीब मुलांना कपडे, खाऊ व खेळणी वाटतात. देशभर मुलांसाठी चित्रपट नाटके दाखवली जातात.

बालदिन हा मुलांचा दिवस असतो. या दिवशी सर्वत्र मुलांचे कौतुक केले जाते. मुलांवर देशाची प्रगती अवलंबून आहे हा दिवस सर्व मुलांना फार आवडतो..

बालदिनाला आम्ही शाळेत बालसभा भरवतो. खास मुलांसाठी छोटे नाटक सादर करतो. बाह्मदिन हा खास मुलांना दिवस असती. म्हणून या दिवशी मुलांचे खूप लाड होतात.

बालपणी होते स्वच्छंद खेळाचे क्षण 
बालपणी होते सर्व सुखाचे धन 
बालपणीच्या आठवणीत हरपते मन 
येणार नाही ते कधीच ते शिवनेरी क्षण 

धन्यवाद 
संजना जिनू राठोड जि. प. प्राथमिक शाळा सुभाषनगर 
तालुका कोरेगाव जिल्हा सातारा

आयुष्याची हार आणि जीत ...

 आयुष्य


कधी कधी वाटते हरलोय का आपण आयुष्यात??

म्हणजे जे आपण मिळवण्याचा प्रयत्न केला ते सगळ दूर निघून जातं. कितीही प्रयत्न केले तरी एखादी गोष्ट कमवायला तरी ती गोष्ट मिळत का नाही. आयुष्याचं कसं असतं ना? आपण लहान होती तेव्हा वाटायचं की मोठे झाल्यावर सगळं सुरळीत होईल पण आता मोठे झालोय तर  आयुष्याच्या प्रत्येक वळणावर काही ना काही सुटत जात आहे प्रयत्न केल्यावर यश मिळतं असं म्हणतात पण कधी कधी ते प्रयत्न कमी  तर पडत नाहीत ना? हा प्रश्न सारखा मनामध्ये येत राहतो. आपण या आशेवर जगत असतो जे होतं ते चांगल्यासाठीचं होतं आणि जे होणार आहे ते पण चांगल्यासाठीचं होणार आहे... ठीक आहे दुःख प्रत्येकाच्या आयुष्यात असतं पण स्वतः त्या प्रत्येक गोष्टींवर कशी मात करायची हे स्वतःलाच ठरवायचं असतं.


आयुष्यभर सोबत असून, जवळ कधी वसत नाही

 एकाच घरात राहून आम्ही, एकमेंकास दिसत नाही.


हरवला ती आपसांतला, जिव्हाळ्याचा संवाद 

एकमेकांस दोष देऊन, नित्य चाले वादविवाद.


धाव धाव धावती आहे, दिशा मात्र कळत नाही. जगती आहोत काहीच कसला  मेळ नाही. 

 इतकं जगून झालं पण, जगायलाच वेळ नाही. हृदयाचे पाऊल कधी, हृद‌याकडे वळत नाही.


क्षण येईल असा घेऊन जाईल हा श्वास. अर्ध्यावर थांबलेला , असेल जीवन प्रवास.


अजूनही वेळ आहे, थोडं तरी जगून घ्या. सुंदर अशा जगण्याला, डोळे भरुन बघून घ्या...


आयुष्य खूप सुंदर अहि ही. ते जगता आलं पाहिजे... दुसऱ्याच्या आनंदामध्ये आपला आनंद शोधा, घ्या हे म्हणायाला फार फार सोपं अहि पुण अनुभवायला खूप अवघड. आयुष्यामध्ये जिंकलो तरी आनंद शोधा आणि हरलो तरी... कारण आयुष्य खूप सुंदर आहे, ते जगायला शिका...


आयुष्याला म्हणायचं, घे किती परीक्षा घ्यायची ते... मी तुझ्या तुझ्या प्रत्येक परीक्षेत पास व्हायला तयार आहे...


- धन्यवाद

- आरोही गोरेगावकर 

- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुभाष नगर तालुका कोरेगाव जिल्हा सातारा


क्रांतिसिंह नाना पाटील

           *क्रांतिसिंह नाना पाटील*       (क्रांतिकारक व समाजसुधारक)            *जन्म : ३ ऑगस्ट १९००* (येडे मच्छिंद्र, वाळवा तालुका सांगली) ...